राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री! पवार दांपत्याचा इतिहास; भावानंतर बहिणीला मिळाले राज्यातील दुसरे सर्वोच्च पद

महाराष्ट्र

मुंबई: राज्याच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहिला गेला असून सुनेत्रा अजित पवार यांनी आज (ता. ३१ जानेवारी) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. विशेष म्हणजे, पती अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या सुनेत्रा पवार या राज्यातील सर्वोच्च दुसरे पद मिळविणाऱ्या पहिल्या बहीण आणि पत्नी ठरल्या आहेत.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी (ता. २८ जानेवारी) बारामतीजवळ झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे आले आणि शनिवारी सायंकाळी त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सर्वप्रथम सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आणि अखेर हा निर्णय जाहीर झाला. अजितदादांनंतर पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्रीपदी काम करणारे पहिले पती-पत्नी म्हणून पवार दांपत्याचा इतिहास घडला आहे.

सुनेत्रा पवार यांना सासर आणि माहेर अशा दोन्ही बाजूंनी राजकारणाचा मोठा वारसा लाभलेला आहे. त्यांच्या बंधू धाराशिवचे ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह बाजीराव पाटील यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक वर्षे काम केले आहे. त्यांनी पाटबंधारे, ऊर्जा, उत्पादन शुल्क आणि गृह अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे. गृहमंत्रिपद हे मुख्यमंत्र्यांनंतर राज्यातील दुसरे क्रमांकाचे महत्त्वाचे पद मानले जाते.

आता मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्रिपद हे राज्यातील दुसरे सर्वोच्च पद मानले जात असल्याने, हे पद मिळविणारे पहिले बहीण-भाऊ ठरण्याचा मान सुनेत्रा पवार आणि डॉ. पद्मसिंह पाटील यांना मिळाला आहे.

अजित पवार यांनी सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम करत राज्याच्या प्रशासनावर आपली ठसठशीत छाप उमटवली होती. त्यांच्या पश्चात आता सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारल्याने पवार कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे चालू राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.