पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. 29 जानेवारी रोजी बारामती तालुक्यात शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अचानक जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोरही अनेक आव्हानं उभी राहिली आहेत.
वक्तशीरपणा, धडाडीचे निर्णय, प्रशासनावरची पकड आणि सडेतोड भाषाशैली यामुळे अजित पवार हे कायम कार्यरत राहणारे, प्रभावी नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनानंतर आता ‘अजित पवारांनंतर कोण?’ हा प्रश्न केवळ भावनिक नाही, तर राजकीयदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कोणाकडे जाणार, पक्षाची पुढील दिशा काय असेल आणि राज्याचा नवा उपमुख्यमंत्री कोण होणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांनी संभाव्य घडामोडींवर भाष्य केलं आहे.
सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वतःच्या पायावर उभं राहावं लागेल. सुनेत्रा पवार यांना तातडीने उपमुख्यमंत्री करण्याचाही पर्याय असू शकतो. मात्र त्यांना प्रत्यक्ष राजकीय आणि मंत्रिपदाचा अनुभव नसल्याचं वास्तव आहे. राजकीय वातावरणात त्यांची वाढ झाली असली, तरी प्रशासनाचा भार पेलणं आव्हानात्मक ठरू शकतं.
जर दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आले, तर आमदार जयंत पाटील किंवा खासदार सुप्रिया सुळे यांचा उपमुख्यमंत्रीपदासाठी विचार होऊ शकतो, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. येत्या आठ-दहा दिवसांत परिस्थिती स्पष्ट होईल, असंही त्यांनी नमूद केलं.
अजित पवार राष्ट्रीय स्तरावर अध्यक्षपद, उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रिपद यांसारखी महत्त्वाची पदं समर्थपणे सांभाळत होते. त्यांची विचारसरणी आणि राजकीय ठसा कायम ठेवायचा असेल, तर सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांना संधी देणं गरजेचं असल्याचं मतही व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजित पवारांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून पुढील काही दिवसांत मोठे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.