पुणे नगर महामार्गावर दोन दुचाकीच्या अपघातात तिघा युवकांचा मृत्यू

शिरूर तालुका

पुणे नगर महामार्गावर कोरेगाव भीमा येथील घटना

शिक्रापूर: कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गालगत कल्याणी चौकात दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात तिघा युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून गुरुदास दत्तात्रय सुर्यवंशी, सागर गुरु नानावत व सुदानंद अनिल नानावत असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत. Koregaon Bhima

कोरेगांव भीमा (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरून २४ जून रोजी रात्रीच्या सुमारास महामार्गावरील अहमदनगर बाजूने गुरुदास सुर्यवंशी हा युवक त्याच्या ताब्यातील एम एच १२ एल जी ५५४८ या दुचाकी हून येत असताना समोरून पुणे बाजूने सदानंद नानावत व सागर नानावत हे दोघे विना नंबरच्या दुचाकीहून आले. यावेळी दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यावेळी अपघातात तिघे युवक गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय व खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिघा युवकांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला आहे.

या अपघातात कोरेगाव भीमा येथील सलून व्यावसायिक गुरुदास दत्तात्रय सुर्यवंशी (वय ५०) रा. दामोदर नगर कोरेगाव भीमा (ता. शिरुर), सागर गुरु नानावत (वय १७) रा. शेरेवस्ती धानोरे (ता. शिरुर) जि. पुणे व सुदानंद अनिल नानावत (वय १८) रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे या तिघा युवकांचा मृत्यू झाला असून याबाबत ऋषिकेश अंबना तळके (वय २४) रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. कडणी ता. शिंदगी जि. वाजापुर राज्य कर्नाटक याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके करत आहे.

चौकात पांढरे पट्टे व ब्लिंकरची गरज…
कोरेगाव भीमासह पुणे नगर महामार्ग रस्त्याचे सहापदरीचे काम जवळपास पूर्ण होत आल्याने वाहने वेगात जात आहेत. मात्र रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांच्याही अपघातात जीवावर बेतत असल्याने चौकांमध्ये पांढरे पट्टे व ब्लिंकर बसविण्याची मागणी सरपंच अमोल गव्हाणे यांनी केली आहे.