शेततळ्यासाठी चार हजारावर शेतकऱ्यांच्या अर्जावर प्रक्रिया

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळ्यांसाठी ६ हजार ४१२ शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली असून त्यापैकी तांत्रिक कारणामुळे नाकारण्यात आलेले आणि शेतकऱ्यांनीच रद्द केलेले अर्ज वगळता ४ हजार १३७ शेतकऱ्यांच्या अर्जावरील कार्यवाही सुरु असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातील पावसातील अनिश्चित येणाऱ्या खंडांमुळे सिंचनाअभावी पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येत असल्याने पावसाळ्यातील पावसाचे पाणी साठवणूक करुन उन्हाळ्यासह टंचाईच्या कालावधीत पिकांसाठी संरक्षित सिंचनाची सोय करण्याच्या दृष्टीने शेततळ्याची सुविधा निर्माण करणे गरजेचे ठरते.

सदर योजनेतून पर्जन्याधारीत शेतीसाठी पाणलोटावर आधारीत जलसंधारणाच्या उपाययोजनांद्वारे पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी शासनाने शेततळे योजना अनुदानावर राबविलेली असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली. त्यामुळे शासनाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचा विस्तार करून या योजनेत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश केला. या योजनेमध्ये शेततळ्याच्या आकार व प्रकारा नुसार १४ हजार ४३३ ते ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते.

सदर योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद असून राज्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली असता त्यापैकी ६ हजार ४१२ शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड झाली. मात्र पोर्टलवर कागदपत्रे अपलोड न केल्यामुळे रद्द झालेले अर्ज तसेच स्वत:हून अर्ज रद्द केलेले शेतकरी वगळता ४ हजार १३७ अर्जावर प्रक्रिया सुरु आहे. यापैकी २ हजार ६२१ शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड केले असून इतर अर्जदारांकडून ही कार्यवाही सुरु आहे.

शेतकऱ्यांनी अपलोड केलेल्या कागदपत्रांची कृषि सहाय्यक आणि त्यानंतर तालुका कृषि अधिकारी यांच्याकडून पडताळणी करण्यात येत असताना आतापर्यंत १ हजार ६८७ अर्जांची तालुका कृषि अधिकाऱ्यांकडून पडताळणी व पूर्वसंमती देण्यात आली असून उर्वरित अर्जांची छाननी सुरु असल्याची माहिती कृषि संचालक मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन रवींद्र भोसले यांनी दिली आहे.