ambadas-misal-jalna

जमिनीचा बांध कोरला म्हणून पुतण्याचा केला खून…

क्राईम

जालनाः शेतातील बांध कोरल्याच्या वादावरून चुलत्यानेच कुऱ्हाडीने वार करून पुतण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना जानेफळ दाभाडी या गावात घडली आहे. अंबादास मिसाळ असे मृत पुतण्याचे नाव असून, शिवाजी जयाजी मिसाळ असे आरोपी चुलत्याचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी मिसाळ आणि त्यांचा पुतण्या अंबादास मिसाळ यांचा जमिनीच्या बांधावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. दोघांमध्ये शुक्रवारी बांध कोरण्यावरून किरकोळ वाद झाला होता. पण काही वेळात तो मिटला होता. अंबादास मिसाळ यांनी काकाच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढली. काकाची समजूत काढल्यावर बाजूलाच असलेल्या घरासमोरील बाजेवर ते झोपले. याचवेळी शिवाजी मिसाळ याने अंबादास मिसाळ यांच्यावर अचानक कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यांच्या मानेवर व गळ्यावर गंभीर वार केले. यामध्ये अंबादास मिसाळ यांचा जागीच मृत्यू झाला. नातेवाइकांनी अंबादास यांना तत्काळ राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृतघोषित केले. या घटनेची माहीती मिळताच हसनाबाद ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक वैशाली पवार पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या.

मयताची पत्नी रेखा अंबादास मिसाळ यांच्या तक्रारीवरून संशयित शिवाजी मिसाळ, मंदाबाई शिवाजी मिसाळ यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि वैशाली पवार या करीत आहेत.