मराठी भाषा सर्वांना सामावून घेणारी भाषा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र

विधानमंडळात ‘साहित्याची ज्ञानयात्रा’उत्साहात संपन्न

मुंबई: जी भाषा जात पात विसरून सर्वांना सामावून घेते तीच विश्वाची भाषा बनते, हे सर्व गुण मराठीत आहेत. या भाषेचा वापर अधिक करुन मराठी भाषा अधिक समृध्द करूया.मराठीचा जास्तीत जास्त वापर आपण करीत राहिले पाहिजे. आवर्जून मराठी बोलले,लिहीले पाहिजे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात ‘मराठी भाषा दिनानिमित्त’ महाराष्ट्र विधानमंडळ आयोजित ‘साहित्याची ज्ञानयात्रा’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.यावेळी या कार्यक्रमास ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गो-हे, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर,संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत दादा पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ,विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,अमृताशी जरी पैज लावली तरी मराठी भाषाच या पैजेत जिंकेल अशी अमृताहून गोड असलेल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो.’साहित्याची ज्ञानयात्रा’ यासारखा सुंदर कार्यक्रम इथे आयोजित केला त्याबद्दल विधिमंडळाचे आभार मानतो.मराठी भाषा ही प्राचीन आणि समृध्द आहे.अगदी महानुभाव साहित्य, ज्ञानेश्वर, तुकाराम असा तिचा भक्कम पाया आहे.

वि स खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे असे ज्ञानपीठ विजेते या भाषेत आहेत. विजय तेंडुलकर, जयंत पवार ते अगदी आत्ताचे प्रणव सखदेव, प्रवीण बांदेकर असे वास्तवाला भिडणारे अनेक लेखक मराठीत आहेत. या मराठी भाषेला अधिक समृध्द करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,शब्दांची देवाणघेवाण झाली पाहिजे अशा देवाणघेवाणमूळे भाषा प्रवाही व जिवंत राहते.महाराष्ट्राला गौरवशाली साहित्य आणि संस्कृतीची परंपरा लाभली आहे.आपलं साहित्य एक अमूल्य ठेवा आहे. राज्य शासनाने अलिकडेच शिवजयंतीच्या मुहूर्तावर राजा बढे यांनी लिहिलेल्या “जय जय महाराष्ट्र माझा” या गीताला राज्यगीताचा दर्जा दिला आहे. साहित्य, मराठी भाषा आणि राज्याचा अभिमान यांना एकत्र आणल्याबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

मराठी भाषा ही २५०० वर्षापूर्वीची आहे.नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण देता येणार आहे.साहित्य संमेलनासाठी साहित्यीकांच्या शासन समस्या सोडवेल आणि मदत करेल.मराठी भाषा भवनाचे काम लवकर पूर्ण करू असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,

मराठी भाषेने अनेक आव्हाने पेलली आहेत; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठी माणसाने नेहमी जगाचा विचार केला आणि त्यामुळेच संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण विश्वाला पसायदान दिले.मराठी भाषेने आजवर अनेक आव्हाने पेलली आहेत. कुसुमाग्रज यांच्या शब्दांतून ख-या अर्थाने शिव म्हणजे सर्व विश्व आहे हा विचार मांडला आहे.मराठी ही प्राचीन भाषा तमिळ किंवा मराठी या दोन्ही भाषांचा वापर यामध्ये दिसतो. अतिशय प्राचीन कालापासून अनेकांनी ही भाषा समृद्ध केली आहे असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जगातील अनेक भाषा संपल्या पण मराठी भाषा ही संपणार नाही. अनेक आव्हान पेलली आहे.ती अधिकाधिक समृद्ध होत जाईल मराठी भाषेचा व्यवहारात वापर झाला पाहिजे ती ज्ञान भाषा झाली पाहिजे,नवीन शैक्षणिक धोरणात उच्च व वैद्यकीय शिक्षण मराठीत घेता येणार.तरुणाईचा जो संबंध तुटत होता, तो उच्च शिक्षणात गेल्यानंतर भाषेशी तुटणारे नाते जोडण्याचा प्रयत्न होत आहे.जगात सर्वात चांगले इंजिनिअर जर्मनीत, ते जर्मन भाषेत शिकत आहेत त्यामुळे घडत आहेत.आम्हीच वर्षानुवर्षे इंग्रजीचा आग्रह धरून ठेवला आता केंद्र शासनानेही नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण देण्याचा निर्णय स्विकारला आहे असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठी भाषेची गौरव पताका जगभरात फडकत आहेत; विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर

विधानसभा अध्यक्ष ॲड राहूल नार्वेकर म्हणाले, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान मराठी भाषा गौरव दिनानिमित्त साहित्यिकांसाठी अपुर्ण अशी मेजवानी उपलब्ध करून देण्यात आली आहे.ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या प्रेरणादायी साहित्यांमुळे मराठी भाषेची गौरव पताका जगात फडकत आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलनात राज्यातील विविध भागातील बोलीभाषा एकाच व्यासपीठावर उपलब्ध होतात ही आपल्या राज्याची बलस्थाने आहेत. बहुभाषिक, बहुसंस्कृती असणारा महाराष्ट्र राज्यासारखा जगात राज्य नसल्याचे त्यांनी सांगितले. आप आपल्याला राज्यातील भाषेचा विकास करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करील असे त्यांनी सांगितले. तसेच मराठी भाषेचा इतिहास, देशातील भाषा,मराठी भाषेचे वैशिष्ट्ये अशी सविस्तर माहिती त्यांनी यावेळी सांगितली

मराठी भाषेसाठी सर्वजण एकत्र येतात; उप सभापती डॉ. नीलम गो-हे

विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गो-हे म्हणाल्या,’साहित्याची ज्ञानयात्रा’ हा कार्यक्रम अत्यंत सुंदर आहे.मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून २७ फेब्रुवारी २००२ मध्ये दोन्ही सभागृहात ठराव मांडला.तसेच इंग्रजी शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.मराठी भाषे साठी सर्वजण एकत्र येतात.समाज माध्यमे आणि मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे देखील मराठीचा चांगला वापर करतात.मराठी भाषा भवन येणारी सर्व कार्यालये एकत्र असावीत.

नवीन मराठी भाषा भवन अभ्यासाचे केंद्र बनेल; मराठी भाषामंत्री दीपक केसरकर

मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर म्हणाले, मराठी भाषेचा मराठी माणसाला अभिमान आहे.मराठीला आपण आई मानतो, त्या मराठीचा आज गौरवाचा दिवस आहे.मराठी भाषेला कधीही मुंबईतून हद्दपार होऊ देणार नाही.शालेय शिक्षण विभाग व मराठी भाषा भवन चा भूखंड शेजारी होते.ते एकत्रित करून मरीन लाईन्स येथे आयकॉनिक वास्तू उभारणार आहे.नव्याने उभे होते असलेले मराठी भाषा भवन ही वास्तू सर्व सोयी सुविधा युक्त असेल.यामध्ये संमेलन,चर्चासत्र,संशोधन केले जाईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.मराठी विश्वकोश ही एक देणगी आहे.मराठी विश्वकोशाचे कार्यालय भाड्याच्या जागेत होते.यावर्षी नवीन प्रस्ताव तयार केला असून वाईला सुंदर इमारत उभारणार आहे.परदेशात शनिवारी व रविवार मराठी भाषा शाळा चालवतात.मराठी भाषा टिकावी यासाठी प्रयत्न करत आहोत.

विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आमदार यामिनिताई जाधव यांनी यावेळी जीवनविषयक कविता सादर केली. सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक व लीना भागवत यांनी अभिवाचन केले.या कार्यक्रमांची संहिता उत्तरा मोने यांची होती. वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यावर आधारित गायक नचिकेत देसाई, धनश्री देशपांडे, अभिषेक नलावडे यांनी गीत गायन केले. या कार्यक्रमाला उपस्थितांनी मनापासून दाद दिली. विधानमंडळ सचिवालयाचे प्रधनसाचिव राजेंद्र भागवत यांनी आभार मानले. सूत्रसंचालन अनुश्री फडणीस यांनी केले.