पावसाळ्यात सापांच्या प्रजननामुळे काळजी घेणे गरजेचे

शिरूर तालुका

शिक्रापूर: सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झालेले असताना सापांच्या प्रजननाचा देखील काळ असल्याने घोणस व नाग या विषारी सापांची पिल्ले घराच्या आजूबाजूला आलेली असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन इंडिया बुक रेकॉर्डचे सर्पमित्र शेरखान शेख यांनी केले आहे.

सध्या सापांच्या प्रजननाचा काळ असल्याने सापांच्या पिल्लांचा जन्म झालेला असून पाण्यामुळे सापांना निवारा नसल्यामुळे सापांसह सापाची पिल्ले निवाऱ्याच्या शोधात घराच्या आजूबाजूला आलेली असतात. घराच्या परिसरात आल्यानंतर सापांची पिल्ले घराबाहेरील जागा तसेच बुटांचा देखील आसरा घेतात. मात्र नागरिक घराबाहेर पडताना बुटांचे निरीक्षक न करताच बुट पायात घालतात. मात्र त्यामध्ये सापाचे पिल्लू बसलेले असल्यास सर्पदंशाची दुर्घटना देखील होऊ शकते, यापूर्वी शिक्रापूर येथे कित्येकदा नागरिकांच्या तसेच लहान मुलांच्या बुटांमध्ये विषारी सापाची पिल्ले बसल्याचे निदर्शनास आलेले आहे.

मुले घराच्या ओट्यावर अभ्यास करत असल्यास तेथील सतरंजी, दप्तर यांचा देखील सापांची पिल्ले आधार घेतात तर लहान मुळे खेळत असलेल्या ठिकाणी कित्येकदा सापांची पिल्ले निदर्शनास येतात त्यामुळे नागरिकांनी या काळामध्ये सापांपासून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन इंडिया बुक रेकॉर्डचे सर्पमित्र शेरखान शेख यांनी केले आहे.