मुंबई: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचार आणि छळवणुकीच्या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश करत मोठे आरोप केले आहेत. आरटीओ विभागातील बदल्या आणि बेकायदेशीर वसुलीसाठी मोठे रॅकेट सक्रिय असून, प्रामाणिक अधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवले जात असल्याचा दावा त्यांनी केला.
वडेट्टीवार यांच्या मते, निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे हे या रॅकेटचे प्रमुख सूत्रधार असून, त्यांनी वसुलीसाठी समांतर यंत्रणा उभी केली आहे. “राज्यात १०० रुपये वसुली झाली तर ९० रुपये स्वतः घेतले जातात,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
चंद्रपूर येथील मोटर वाहन निरीक्षक पवन पोटदुखे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) मार्फत झालेली कारवाई ही पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा आरोपही त्यांनी केला. तक्रारदाराच्या प्रवासातील विसंगती आणि टोल नोंदीतील तफावत यावरून हे प्रकरण बनावट असल्याचे त्यांनी सूचित केले.
विदर्भातील ६४ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये काही प्रभावशाली व्यक्तींची मर्जी न झाल्याने त्यांच्या पदोन्नतीत अडथळे आणले जात असल्याचा आरोप करत, “जे अधिकारी वसुलीला नकार देतात त्यांना एसीबीच्या जाळ्यात अडकवले जाते किंवा बदलीची धमकी दिली जाते,” असे वडेट्टीवार म्हणाले. त्यांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले.
याशिवाय, अशोक खरात प्रकरण आणि मंत्र्यांच्या शासकीय निवासाच्या कथित गैरवापराबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. काही जण तंत्र-मंत्राचा आधार घेत सत्तास्थानी टिकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत, “संविधानाची शपथ घेणाऱ्यांना हे शोभणारे नाही,” अशी टीकाही त्यांनी केली.
पुणे जमीन घोटाळा असो किंवा आरटीओमधील वसुली प्रकरण—सरकार मोठ्या आरोपींना वाचवत असून केवळ लहान अधिकाऱ्यांवर कारवाई करत असल्याचा आरोप करत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “सरकारमध्ये अंतर्गत गटबाजी आणि गँगवॉर सुरू असून त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होत आहे,” असेही ते म्हणाले.